Tuesday 14 May 2019

द्वंद्वरामायण... गांधी की गोडसे?

गेल्या दोन दिवसातल्या काही बातम्या...
एक म्हणजे कमल हसन यांचं वक्तव्य की, “स्वतंत्र भारतातला पहिला अतिरेकी हिंदू होता आणि त्याचं नाव नथुराम गोडसे.”
दुसरं असं की, ‘सावरकरांनी इंग्रज सरकारची माफी मागून सुटका करून घेतली आणि त्यांच्यावर गांधीहत्येच्या कटात सहभागी असण्याचाही आरोप होता’ असा राजस्थानच्या नवीन शालेय पाठ्यपुस्तकामध्ये उल्लेख केला असल्याचे समजले.
या दोन्ही गोष्टींच्या संदर्भात काही मुद्दे...

गांधी आणि सावरकर यांची पहिली जाहीर आमनासामनी झाली होती १९०९ साली लंडनमधल्या इंडिया हाऊसमध्ये. गांधी दक्षिण आफ्रिकेतल्या लढयासंदर्भात लंडनला होते. विजयादशमीच्या दिवशीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी होते. त्यावेळी सावरकर आणि गांधी दोघांनीही भाषण केलं. सावरकरांनी रामाच्या ‘आक्रमक’ असण्याचा मुद्दा अधोरेखित केला तर अध्यक्षीय भाषणात गांधीनी ‘प्रजाहितदक्ष’ रामाची मांडणी केली.

तेंव्हाच या दोन्ही व्यक्ती-प्रवृत्ती राजकीय क्षितिजावरचे दोन विरोधी ध्रुव आहेत, हे इतिहासाला ज्ञात झालं होतं. या नंतर सावरकरांना जॅक्सन खून खटला, देशद्रोह अशा आरोपांखाली अटक झाली. सावरकर अंदमानच्या कोठडीतून सुटले ते ६ जानेवारी १९२४ साली. त्यांनी इंग्रजांना आपण केलेल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करून अनेक मर्सी पिटीशन्स अर्थात दयेचे अर्ज केले होते हे वास्तव आहे. त्यांची अंदमानातून सुटका झाल्यावरही त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलं होतं. या काळात राजकीय चळवळ ते करू शकत नव्हते. १० मे १९३७ साली पूर्ण मुक्तता झाल्यावर त्यांनी हिंदू महासभेचे नेतृत्व स्वीकारले.

दुसऱ्या बाजूला गांधी १९१५ साली दक्षिण आफ्रिकेतील यशस्वी लढ्याचं वलय घेऊन भारतात आले. टिळकांच्या मृत्यूनंतर १९२० साली गांधी देशाचे नेते झाले. त्याआधी भारताच्या मवाळ,जहाल,अतिजहाल अशा सगळ्या गटाचे नेते अनुक्रमे गोखले, टिळक आणि सावरकर असे प्रामुख्याने चित्पावन ब्राम्हणच होते. गांधी हा माणूस विचित्र. संत प्रवृत्तीचा सुद्धा आणि पक्का बनिया राजकारणी सुद्धा. या ब्राम्हण नसलेल्या गांधींचं नेतृत्व स्वीकारावं कि नको, या पेचात टिळकांचे अनेक ब्राम्हण अनुयायी होते. दोन गट पडले. ज्यांनी हसतमुखाने टिळक पगडी त्यागून गांधी टोपी स्वीकारली असा एक गट आणि ज्यांनी गांधीना विरोध करण्याचं धोरण अवलंबले, असा एक गट. टिळकानंतर गांधींना कडवा विरोध या ब्राम्हण वर्गाकडून झाला असला तरी गांधींचं नेतृत्व प्रस्थापित करण्यातही अनेक ब्राम्हण अनुयायांचा महत्वाचा वाटा होता, हे विशेष.

सावरकरांची अटक आणि सुटका या २७ वर्षाच्या काळात देशाचं चित्र पूर्ण पालटून गेलं होतं. स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग अहिंसक सत्याग्रही बनला होता. इंग्रजांनी सशस्त्र संघटना मोडून काढल्या होत्या. सारा देश गांधींच्या मागे उभा होता. अर्थातच बहुसंख्य हिंदू जनतादेखील गांधींच्या मागेच. हे ‘रणावाचून’ जवळ येणारे स्वातंत्र्य पाहून सावरकर विचलित होणं स्वाभाविक होतं.

गांधींच्या ‘रामा’ने त्यांची दिशा ठरवली होती आणि सावरकरांच्या ‘रामा’ने त्यांची. हे या दोघांमधलं  द्वंद्वरामायण आहे. भारताचा ‘राम’ कोणता यातला हा संघर्ष आहे. त्या रामाचं आंतरिक मूल्य काय असावं यातला हा संघर्ष आहे. याची परिणती झाली ती नथुराम गोडसे नावाच्या सावरकर शिष्याने गांधींचा खून केला तेही रामाच्या प्रार्थनेला जाताना. या साऱ्या अध्यायातही मोठी गंमत आहे. ती अशी कि, आयुष्यभर राजकीय क्रांतीची भाषा बोलून शस्त्राचार सांगणाऱ्या सावरकरांचा मृत्यू हा शेवटी उपोषण करून, आत्मार्पण करून व्हावा आणि रामनामाचा जप करत आमरण उपोषणासारख्या स्वपिडा देणाऱ्या मार्गाचा आपल्या राजकारणात सातत्याने उपयोग करणाऱ्या गांधींचा मृत्यू हा प्रार्थनेला जाताना रक्त सांडून व्हावा, हाही नियतीचा खेळच म्हणायला हवा.

गांधीहत्येचे १९३४ पासून अनेक प्रयत्न झालेत ज्यात गोडसे-आपटे टोळी कार्यरत होती. बाकी फाळणी,५५ कोटी, मुस्लीम अनुनय ही सारी फसवी आणि आपले गांधीहत्येच्या कृत्याला सहानुभूती मिळावी म्हणून पुढे केली गेलेली खोटारडी कारणे आहेत, हे इतिहासाचा डोळे उघडून अभ्यास करणारा कुणीही व्यक्ती सांगू शकेल. गांधीहत्या हे कृत्य आपण एकट्यानेच पार पाडल्याचे नथुरामने न्यायालयातील आपल्या वक्तव्यात किती जरी ठासून सांगितल असलं तरी ते वास्तव नाहीच. ही खुनी टोळी होती. या कटातील आरोपी होते नारायण आपटे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, विष्णू करकरे, दिगंबर बडगे, दत्तात्रय परचुरे, शंकर किस्तय्या आणि विनायक सावरकर. नथुराम इतकाच महत्वाचा व्यक्ती आहे नारायण आपटे. नारायणचे चंपूताई फडतरेशी लग्न झालेले असूनही मनोरमा साळवी नावाच्या ख्रिश्चन मुलीशी विवाहबाह्य संबंध होते. स्त्रिया, दारू, सिगारेट, मांसाहार आणि इतर भौतिक सुखाचे त्याला आकर्षण होते.

गांधींवर हत्येचे झालेल्या अनेक प्रयत्नांचा थोडक्यात उल्लेख करता येईल. १९३४ सालचा बॉम्बहल्ला. गांधी अस्पृश्यताविरोधी मोहिमेसाठी देशभर दौरा करत असताना पुण्यात नगरपालिका सभागृहात प्रवेश करताना त्यांच्यावर बॉम्बहल्ला केला होता. गांधी मागच्या मोटारीत होते म्हणून बॉम्ब दुसऱ्याच गाडीवर पडला, म्हणून गांधी वाचले. दुसरा प्रयत्न १९४४ मध्ये आगाखान पॅलेसमधून सुटका झाल्यावर गांधी विश्रांतीसाठी म्हणून पाचगणीला राहिले होते. तेंव्हा नथुराम प्रार्थनेच्या वेळी हातात कट्यार घेऊन गांधीच्या विरोधात घोषणा देत धावला होता. त्याला साताऱ्याच्या भिलारे गुरुजींनी अडवलं होतं ज्यांचं 2 वर्षापूर्वी नुकतच निधन झालं. तिसरा प्रयत्न १९४४ मधील सेवाग्राम आश्रमातला. गांधी मुंबईला जिनासोबत पाकिस्तानबाबत चर्चा करण्यासाठी जात होते. ही चर्चा होऊ नये म्हणून या गटाकडून निदर्शने करण्यात येत होती. यांच्याकडून धारदार जंबिया जप्त करण्यात आला होता. चौथा अयशस्वी प्रयत्न २० जानेवारीचा ज्यात फक्त मदनलाल पकडला गेला. त्या प्रार्थनेवेळी खुनी टोळीकडे हात बॉम्ब, गण कॉटण स्लॅब आणि पिस्तुलं होती. मदनलालने स्फोट केल्यावर होणाऱ्या गोंधळाचा फायदा घेऊन सगळ्यांनी गांधींच्या दिशेने गोळ्या आणि बॉम्ब फेकायचे, असं ठरलेलं पण ऐनवेळी कच खाल्ल्याने फक्त मदनलाल पकडला गेला. या सगळ्या प्रयत्नात नारायण आपटे हा मुख्य सूत्रधार होता. नथुराम त्याचा भाग होता. यांनतर मात्र नथुरामने संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि ३० जानेवारीला प्रार्थनेच्या वेळी पाया पडण्याचा बहाणा करून  गोळ्या झाडून गांधींची हत्त्या केली.

गांधीहत्या हा खटला पोलिसांच्या शोधकार्यावर नव्हे तर दिगंबर बडगे या आरोपीच्या माफीचा साक्षीदार बनल्यामुळे सुटला. ज्या ज्या गोष्टींना दुजोरा देणारा पुरावा मिळाला त्यानुसार न्यायालयाने निकाल दिला.
सावरकर या खटल्यातून पुराव्याअभावी निर्दोष सुटले होते. या साऱ्या खुनी टोळीला वेळोवेळी मदत मिळाली आहे ती हिंदू महासभेच्या अनेक कार्यकर्त्याची आणि हितचिंतकांची. साऱ्या खुनी टोळीला सावरकर हे व्यक्तिमत्व निर्विवादपणे शिरसावज्ञ होतं. ते त्यांचे शिष्य होते, हे खुद्द सावरकरही नाकारू शकणार नाहीत. मदनलाल पहावा वगळता सारे आरोपी ब्राम्हण होते हे विशेष.

सावरकर कटात सहभागी होते की नव्हते हा प्रश्न सातत्याने चघळला जातो. ते होते की नव्हते हा प्रश्न जरी मुद्दाम टाळला तरी ते हा खून रोखू शकत होते की नव्हते हा प्रश्न शिल्लक राहतोच.

राजस्थानची शालेय पाठ्यपुस्तके वाचायला मिळतील नाही मिळतील, पण यासंदर्भात बोलणारी दोन्ही बाजूची पुस्तके जरूर वाचा. गोपाळ गोडसे यांची '५५ कोटींचे बळी' 'गांधीहत्या आणि मी' यावर आधारित अनैतिहासिक नाटक 'मी नथुराम गोडसे बोलतोय' तसेच जगन फडणीस यांचं 'महात्म्याची अखेर' नथुराम नाटकाची चिरफाड करणार य दि फडके यांचं 'नथुरामायन' तसेच तुषार गांधी यांचं 'लेट्स किल गांधी' सुद्धा...
दोन्ही बाजू वाचा...

कमल हसन यांचा ‘हे राम’ हा गांधीहत्येवर आधारित चित्रपट मध्यंतरी आला होता. तो पाहण्यासारखा आहे. बाकी हा सगळा संघर्ष ‘राम’ आणि त्याचं मूल्य काय असावं याचा आहे. तो चिरंतन आहे. कमल हसन यांच्या विधानाकडे मी या दृष्टीतून पाहतो. गोडसेने केलेलं कृत्य हे रामाचा आशय बदलण्यासाठी घातलेला पहिला घाव होता. त्यानंतर असे अनेक घाव भारताने पहिले आहेत. मग ते १९९२ ची बाबरी असो वा २००२ चे गोधरा... वा अलीकडे झालेले दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-लंकेश यांचे खून...

नथुरामचा ‘राम’ की गांधींचा ‘राम’स्वीकाराचा. सत्याला साक्षी ठेऊन ज्याने त्याने निर्णय घ्यावा.
हे खरय की गांधी कभी मरते नही...
पण म्हणून नथुराम संपला असं समजून कसं चालेल...?

या सगळ्यावर बोलत राहूच...

#लवकरच....

- विनायक होगाडे


No comments:

Post a Comment