Saturday 26 November 2016

महात्मा फुले - समज-गैरसमज...

 

   महात्मा फुलेंचा सनातनी,विषमतामूलक समाजव्यवस्थेविरोधातला लढा अर्थातच काही सनातनी धर्मांध लोकांना बघवला नाही...आणि त्यांच्यावर ते हयात असल्यापासून ते आजतागायत अनुदार टिका-टिप्पणी केली जाते...
त्यांच्याविषयी मुद्दाम काही गैरसमज पसरवून त्यांची बदनामी करण्यात काही प्रवृत्तींना रस आहे...अर्थातच महात्मा फुल्यांविषयी अफवांचे आणि गैरसमजाचे धुके उभारल्याशिवाय त्यांचे मानवमुक्तीचे,समाजसुधारनेचे कार्य झांकोळले जाणार नाही...हे पुरेपूर माहिती असल्यामुळे त्यांची ही नाहक बदनामी केली जाते...
आणि आता तर सोशल मीडियासारखे माध्यम ह्या कुजबुजप्रचारकांचे महत्वाचे शस्त्रच बनले आहे...वाचनसंस्कृतीचा एकाबाजुला लोप होत असताना...गैरसमजांची ही वावटळे अधिकच धोकादायक ठरण्याचा निश्चितच संभव आहे...!

     महात्मा फुले ब्रिटिशांचे एजंट होते...ते ब्राम्हणद्वेष्टे,स्वधर्मद्रोही आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक होते...त्यांनी शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढले...असे काहीबाही आरोप त्यांच्यावर ठेऊन त्यांचा द्वेषमूलक प्रचार सध्या केला जातोय...!
म्हणूनच या पुस्तिकेत या खोट्या आणि अवास्तव अारोपांचे खंडन करणे अत्यंत गरजेचे वाटते.

       महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना बावळट,दुधखुळा,अक्षरशत्रू,मुर्ख असे म्हणून त्यांचा अपमान आणि त्यांची बदनामी केली आहे,असा आरोप काही लोक करतात. साधारण 150 वर्षापुर्वी महात्मा फूल्यांन्या प्रगत संशोधित कागदपत्रे उपलब्ध नव्हती,त्यामुळे शिवरायांना लिहता येत होते की नाही याबद्दल तेंव्हाही वाद होते.त्याअर्थाने म.फुले राजांना 'अक्षरशून्य' समजत होते.आणि आपल्या गुलामगिरी या पुस्तकात त्यांनी याचा उल्लेख केला आहे.म.फूल्यानंतर कितीतरी वर्षानंतर महाराजांच्या हस्ताक्षराचा नमूना उपलब्ध झाला आहे,हे विसरून चालणार नाही...!
महात्मा फुल्यांचा पोवाडा ग्रँट डफ,मरी वगैरे इंग्रज लोकांच्या लेखी आधारावरुन केला असल्याचे पवाड्याच्या सुरवातीसच त्यांनी म्हटले आहे.त्या काळात शिवाजी महाराजांविषयी फुल्यांना जे काही वाचावयास मिळाले,त्यावरुन त्यांच्या लिखानात उपलब्ध अपुर्या माहितीमुळे काही चुकीची विधाने केली असली तर ती समर्थनीय नसली तरी समजण्यासारखी निश्चितच आहेत.
पण मुद्दाम काही सनातनी याचा बावा करुण महात्मा फुले शिवरायांचे द्वेष्टे होते असा विपर्यस्त आणि हेतूपुर्वक दुष्टावा करणारा बुद्दिभेद करतात.
महात्मा फुलेंनी जून 1869 मध्ये 'छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा' नावाचा ग्रंथ लिहून लोकहितार्थ प्रसिद्ध केला. या पोवाड्यात फुल्यांनी शिवचरित्रातील बहुतेक सर्व महत्वाचे प्रसंग सहजपणे व प्रवाही भाषेत ग्रंथित केले आहेत.सोपेपणा,समर्पकता व सफाई पद्यशैलीतून शिवाजी राजांची बुद्धिमत्ता,चातुर्य,कर्तबगारी,सावधपणा,निर्लोभी वृत्ती,उदारता या गुणांचे वर्णन केले आहे.महात्मा फुल्यांनी सर्वप्रथम रायगडावरील शिवाजीराजांच्या समाधीचा शोध घेतला.जोतीराव व नारायण लोखंडे यांनी शिवरायांच्या समाधीच्या दुरुस्तीसाठी निधी गोळा करण्यासाठी मुंबई आणि पुणे येथे अनेक ठिकाणी सभा घेतल्या.शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोंद्धारासाठी फुल्यांनी सर्वप्रथम धडपड केली.त्यानंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या वंशजांची बाजू घेऊन तुरुंगवास भोगल्याबद्दल टिळक-आगरकरांचा फुल्यांनी जाहिर सत्कार आणि मानपत्र देऊ केले.जेंव्हा महाराष्ट्रातील समकालीन नेते शिवाजी महाराजांच्या अमर कृतीला विसरले होते तेंव्हा जोतिबांनी त्यांच्या पराक्रमाचे आणि वैभवशाली राजवटीचे पोवाडे गायले होते.
तेंव्हा म.फुलेकालीन इतिहास,संशोधन,लोकसमजुती,म.फुल्यांचा मूळ संदर्भ आणि त्यांची व्यापक समग्र आदरभावना यांचा एकत्रित विचार करता म.फुल्यांच्या मनात शिवाजीराजांबद्दल तीळमात्रही अनादराची भावना नव्हती,ही गोष्ट सिद्ध होते...!

       महात्मा फुल्यांनी स्वधर्मातील म्हणजेच हिंदू धर्मातील दुष्ट आणि अन्यायी चालीरीतींविरोधात बंड पुकारुन स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या मूल्यांची स्थापना समाजात व्हावी म्हणून उभ्या आयूष्यभर लढा दिला...म्हणून काही सनातनी लोकांनी त्यांना स्वधर्मद्रोही,देशद्रोही ठरवून 'विघ्नसंतोषी महात्मा' अशा शब्दात त्यांचे वर्णन केले. अनेक वर्ष हे लोक डोळे झाकून त्यांच्यावर 'मिशनर्यांचाहस्तक' वगैरे शिक्का मारित आले.म.फुल्यांवर ख्रिश्चन मिशनर्यांचा प्रभाव होता इथ पासून ते फुले ख्रिश्चन झाले होते,इथपर्यंत अफवांनी धुमाकूळ घातला आहे.
प्रत्यक्षात ज्या काळात आजुबाजुला अनेक उच्चवर्णीय लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत होते,त्याकाळात म.फुले सोडाच,परंतु त्यांच्या सत्यशोधक समाजातील एकाही सभासद झालेला नव्हता,याचा अर्थ काय?
म.फुले स्वधर्मचिकित्सा करत होते म्हणून ते ख्रिश्चन झाले असावेत अशा अफवा पसरवण्यात भल्याभल्यांचा वाटा असावा याचा खेद वाटतो...!

       महात्मा फूलेंनी समाजसुधारणा करताना ब्राम्हण्यावर कडाडून हल्ला केला आहे.धर्माच्या आडपडद्यात तत्कालीन तथाकथित उच्चवर्णियांनी हजारो वर्षे शुद्र-अतिशूद्रांचे शोषण केले...लोकहितवादी,महात्मा फुले आदि समाजसुधारकांनी तत्कालिन समाजाचे धुरिणत्व ब्राम्हणांकडे असल्याने साऱ्या सामाजिक अनागोंदीचे आणि दोषांचे खापर प्रामुख्याने या वर्गावर फोडले.पण त्यात व्यक्तीद्वेषाचा अजिबात भाग नव्हता. होती ती समाजसुधारणेची जीवंत तळमळ...! म.फुल्यांनी नेतृत्व करणाऱ्या सर्वच गटांवर हल्ला केलेला आहे.क्षत्रियांच्या वर्णविषयक अहंकारही त्यांना तितकाच आक्षेपार्ह वाटतो.
म.फुले यांचा हल्ला दांभिकपणावर होता,मग तो ब्राम्हणांचा असो वा ब्राम्हणतेरांचा.त्यामुळे म.फुल्यांनी ब्राम्हणांचा द्वेष केला हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही.

      शुद्रातीशूद्रांच्या उत्थापनासाठी सामाजिक रोषाला पत्करून प्रस्थापितांविरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेल्या याच फुल्यांनी ब्राम्हण विधवांच्या केशवपनाची अमानुष प्रथा बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला.
या विधवांच्या बाळंतपणाची सोय म्हणून बालहत्त्याप्रतिबंधक गृह काढले. म.फुले यांचा हल्ला दांभिकपणावर होता,मग तो ब्राम्हणांचा असो वा ब्राम्हणतेरांचा.त्यामुळे म.फुल्यांनी ब्राम्हणांचा द्वेष केला हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही.

     'म.फुले ब्रिटिशांचे एजंट होते' अशासारखे भरमसाठ आरोप करणारे एकूण मूळ पुरावे न पाहता,केवळ दंतकथांवर विश्वास ठेऊन,अशा समजुती वर्षानुवर्षे पसरवित राहतात. इंग्रजांची परकीय राजवट आज ना उद्या जाणारच आहे,याची स्पष्ट कल्पना जोतिबांना होती,म्हणून तर ते म्हणतात की,"इंग्रज लोक आज आहेत,उद्या नाहीत,ते आपल्या जन्मास पुरतील म्हणोन कोणाच्याने ख़ास करुण सांगवत नाही.यास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे,तोच आपण सर्व शूद्रांनी जलदी करून भटांच्या वडिलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे यामध्ये मोठा शहाणपना आहे..!"

        पेशवाईची क्रूर राजवट बुडल्यानंतर इग्रजांचे राज्य आले.इंग्रजी राज्यामुळे मालमत्तेची सुरक्षितता,शिक्षण,दवाखाने,पुल,कॅनॉल अशा विविध सुविधा प्राप्त झाल्या आणि म्हणून सामान्य लोकांचे जीवन सुखकर झाले. इंग्रजांनी या देशात आधुनिक उत्पादनपद्धती,आधुनिक शिक्षण,आणि सामाजिक समतेचे तत्व यांची प्रस्थापना केली. अंधश्रद्धा आणि शब्दप्रामाण्याऐवजी वास्तव आणि तर्कशुद्ध विचारांची नवसंस्कृती येथे आणली. इहवाद आणि विज्ञानवादाचा पाया घालून समतेवर आधारित कायदा आणि सुव्यवस्था,स्वातंत्र्य आणि अधिकार या संकल्पना आणल्या.म्हणूनच म.फुले,न्या.रानडे,लोकहितवादीसारख्या अनेक समाजसुधारकांनी इंग्रजांबद्दल भले उद्गार काढले. ब्रिटिश आल्यावर इथल्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर या
प्रतिक्रिया समजन्यासारख्या होत्या.

     एकूणच काय...?
तर असे अवास्तव प्रश्नाचे धुके उपस्थित करुण प्रतिगाम्यांनी सूर्यावर थुंकण्याचाच प्रयत्न केला आहे,पण असल्या थुंकण्याने सूर्यावर परिणाम होत नसतो...उलटपक्षी सूर्याच्या तेजाचे थुंकणार्यालाच चटके बसतात.
आणि म्हणूनच...म.फुल्यांचे समग्र कार्य आणि विचार यांचे परिशीलन केल्यानंतर कोणीही तटस्थ वृत्तीचा माणूस प्रांजलपणाने निश्चितच कबूली देईल की,"होय...जोतीराव फुले महात्माच होते...!"
त्यांच्या या ऐतिहासिक स्थानाविषयी प्रश्न उपस्थित करण्याआधी फुलेद्वेष्टयांनी थोड़ा तरी सारासार विचार केला असता तरी त्यांच्या लक्षात आले असते की ज्या मुद्द्यावर सगळी भिस्त ठेऊन ते फुलेंची नालस्ती करु पाहत आहेत,ते सगळे मुद्दे अतिशय ठिसूळ,तत्कालिक स्वरुपाचे किंवा कालसापेक्षतेमुळे निर्माण झालेले होते.एकही असा मुद्दा नाही की ज्या आधारावर जोतिबांच्या "महात्मा" पदाला आव्हान देता येईल.

      आणि म्हणूनच...नरेंद्र दाभोलकर एके ठिकाणी म्हणतात की,"महाराष्ट्राला सलग असा दीडशे वर्षांचा व्यापक आणि समृद्ध असा समाजसुधारकांचा वारसा लाभला आहे....महात्मा फूलेंपासून ते प्रबोधनकार ठकरेपर्यन्तची ही चळवळ इतर कोणत्याही राज्याला लाभली नाही...
जर आपण असं मानल की ही सगळी मंडळी समाजसुधारनेची विद्यापीठे होती... तर विद्यापीठाला एकेक कुलगुरु असतो आणि सर्व कुलगुरूंचा मिळून एक कुलपती असतो...तर तसेच जोतीराव फुले हे या समाजसुधारनेच्या विद्यापीठांचे      कुलपती आहेत...!

      मित्रांनो,महात्मा फुले खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असतील तर त्यांचे मूळ लिखाण वाचले पाहिजेत...गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके त्यांच्या विचारांचे महत्वाचे दोन पैलू आहेत...
सोशल मिडियावर विपर्यस्त पद्धतीने येणाऱ्या बुद्दिभेदी मजकुरांवर अंधविश्वास ठेऊन एखाद्या महामानवाबद्दल मत बनवण्याआधी शोधक बुद्धिने चिकित्सक पद्धतीने मागोवा घेऊन आपले विचार वृद्धिगत कराल,अशी अपेक्षा...

- विनायक होगाडे...

5 comments:

  1. पुर्ण माहिती नसताना एखाद्या महापुरुषाला 'अक्षरशुन्य' म्हणणाराला 'अक्कलशुन्य'च म्हणावे लागेल. महात्मा नव्हे विद्रोही,

    ReplyDelete
  2. शुवजी अक्षरशत्रू व पैगंबर दयाळू. वा वा जी व्यक्ती पोवाडा लिहिते, क्रूर इतिहासाकडे दुर्लक्ष करून त्याला दयाळू म्हणते त्या व्यक्तीचे यद्देश स्पष्ट दिसतात. कोणताही आधार नसताना आर्य द्रविड काल्पनिक संघर्षाला पुष्टी जोडते अशी व्यक्ती ब्रिटिश एजंट नव्हती तर कोण होती?

    ReplyDelete
  3. मग ज्ञानेश्वरी च्या बाराव्या अध्यायावर फुलेंनी टीका का केली आणि ती हि अत्यंत खोटी, कृष्णाला वृदांवनस्थ जारशिरोमनी
    म्हणणे किती शहाणपणाचे , असे कसे हे महात्मा

    ReplyDelete
  4. फुले भडवा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अक्षर शुन्य म्हणणे आणि त्याचे समर्थन करणे निंदनीय आहे.

    ReplyDelete