Wednesday 28 March 2018

असत्याचे प्रयोग (भाग 2)

(नथुराम खुर्चीत बसलेला... हातात दैनिक हिंदुराष्ट्र... तिकडून नारायण आपटेची एन्ट्री)

नारायण : नथुराम... हंत... हंत... अरे हंत झाला रे...

नथुराम : काय झालं... इतका गर्भगळीत का झालायस नारायण...?

हा मूढ काय वक्तव्य करतोय पहा ना...
म्हणे गांधी,आंबेडकर आणि विवेकानंद यांचे हिंदुत्व खरे...
हे ऐकताना कुणी माझ्या कानात शिश्याचा रस ओतावा अगदी तसे झाले हो...

नथुराम :हा मग...?

नारायण : अरे पंडित... तुला काहीच कस समजत नाहीय... तू इतका उदासीन कसा यावर...?

नथुराम : विवेकानंदांच्या हिंदुत्वाबद्दल आक्षेप तो काय असावा...?

नारायण : मी विवेकानंद यांच्याबद्दल काही बोलत नाहीय...
पण आंबेडकर...? ज्यांनी आपला सनातन हिंदू धर्म सोडला आणि बुद्ध अंगिकारला... त्यांचं कसलं हिंदुत्व...?

नथुराम : अरे त्यांनी अस्पृश्योद्धाराचं काम केलंय....

नारायण : हा पण...
मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही... असे बोलणारे आंबेडकर यांना हिंदुत्ववादी वाटत असतील तर मग धन्य हो...
आणि काय...
गांधी...?
गांधींचं हिंदुत्व...?
ज्यांनी देश उभा फाडला म्हणून आपण बोंबाबोंब केली आणि त्यांना यमसदनी जाण्यास मदत केली...
त्यांचं हिंदुत्व...?
म्हणजे मग काय आपण काय सारिपाटाचा खेळ मांडला होता काय तेंव्हा...?

नथुराम : अरे हीच तर कूटनीती आहे नाना...

नारायण : अरे कसली कुटनीती...?
खऱ्या हिंदुत्वात तात्यारावांचे नाव न घेताना यांना लाज नको वाटायला...?

नथुराम : हा हा हा... (छद्मी हसत)
अरे थोडा शांत हो... पाणी पी...

नारायण : नथुराम... काहीच घडलं नाही असा शांत तू कसा काय...?

नथुराम : हे बघ... तुझी होणारी तडफड मला समजतीय... पण राजकारणात तू तेंव्हाही कच्चा होतास आणि अजूनही तसाच आहेस... म्याडोबा कुठला...?

नारायण : पंडित... आधीच भागवतांच ते वक्तव्य ऐकून माझी तळपायाची आग मस्तकाला गेलीय... त्यात तू मला आणखी खिजवू नकोस... कसली कुटनीती सांग मला...

नथुराम : बरं ऐक...
गांधी हा आपल्या हिंदुत्वाच्या राजकारणातला मोठा काटा होता हे मान्यय... त्यात वाद नसावा...
टिळकांनंतर स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व अर्थातच आपल्याकडच्या कुणा नेत्याकडे जायला हवं होतं...
हवं ते सावरकर,केळकर,मुंजे... वा तत्सम कुणीही...
पण ते गेलं गांधींकडे...

नारायण : अरे इथेच तर माशी शिंकली ना...!

नथुराम : टिळक असताना महाराष्ट्र हा केंद्रबिंदू ठरुन... ते ही सारं काही चित्पावन ब्राम्हनांच्या भोवतीनेच फिरणारे भारतीय स्वातंत्र्याचं राजकारण होतं... नेमस्तही चित्पावन आणि जहाल - अति जहालही चित्पावनच...!
पण बनिया गांधींकडे नेतृत्व गेलं आणि आपल्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा पायाच खचला...
याच्या आंदोलनात गोखल्यांच्या राजकारणाची नैतिक चौकट तर आहे तशीच पण टिळकांच्या मार्गाचा जहालपणादेखील ठासून भरलेला...

नारायण : पंडित... तू गांधींचं कौतुक करतोयस...?

नथुराम : नाही... लक्ष्यात घे... कुटनीती करताना आधी पांढरी बाजू समजावी लागते... मग तिला काळी करता येते... खोटं समाजात पेरताना खर्याचं भानही लागतंच...
ते तुला नाही समजत... म्हणून तुला राजकारण समजत नाही...
असो मी काय म्हणत होतो... तर
गांधींच्या राजकारणामुळे आपलं हिंदुत्ववादी राजकारण नगण्य झालं आणि म्हणून आपण गांधींचं काटा काढला... आणि कारणं पुढे केली ती फाळणी आणि 55 कोटींची...

नारायण : हो... मुद्दा तो नाहींचय...
आता सगळी बाजू आपल्या हातात असतांना यांनी हिंदुत्व विसरोनी गांधींचे गुण गावे...?
आलेल्या परदेशी पाहुण्याला रेशीमबागेत न नेता साबरमतीचा आश्रम दाखवावा...?
हे सहन न होणार आहे पंडित...

नथुराम : कितीही झालं तरी गांधी या मातीत वसला आहे... त्याला टाळून राजकारण शक्य नाही... कारण गांधी फक्त राजकारणी नव्हता... तो इथल्या लोकांसाठी संत देखील होता...
गांधींला त्याच्या राजकारणापासून,समाजकारणापासून जर गांधी तोडून मोकळा करता आला तर गोहत्येच्या विरोधी असणारा... हिंदू धर्मावर श्रद्धा असणारा एक महान हिंदू संत म्हणून गांधी पचवणे संघाला जड जाणार नाही... कारण श्रद्धाळू जनतेच्या मनात श्रद्धास्थान म्हणून जी माणसे उभी आहेत ती सगळीच संघाने आत्मसात केलीयत...
म्हणून जगाला दाखवण्याकरता का होईना पण गांधीही संघासाठी प्रातःस्मरणीय ठरतो...

नारायण : हा हलकट गांधी... साला मरता मरत नाही... अजूनही ढवळाढवळ करतो म्हणजे काय...? अजूनही आपल्या आडवा येतो म्हणजे काय...?

नथुराम : ही कुटनीतीच अशी आहे...
ज्यांना जनतेला शहांण करायचं नसत.. त्यांना जनतेच्या सगळ्याच श्रद्धा आपल्या मानाव्या लागतात...
आता हेच बघ ना... स्वतंत्र धर्म हवा म्हणून मागणी करणारे लिंगायातही
संघाच्या हिंदुत्वाचेच... आणि बुद्ध तर हिंदुत्वाचा खासच... तात्याराव ही यांचेच आणि गांधीही यांचेच...

नारायण : तात्यारावांवरुन आठवलं...
अरे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकात तू म्हणालास की ' जे जे काही माझ्याहातून वाईट घडलं त्यांचं श्रेय माझं आणि जे काही चांगलं घडलं त्याचं श्रेय मात्र तात्यारावांचे...!
मग तू गांधींचा वध केलास ही तुझ्याहातून घडलेली गोष्ट आता चांगली समजतोस की वाईट...?

नथुराम : ( रागात) राजकारणातले दोन डावपेच काय समजावून सांगितले... लगेच माझ्यावरच उलटलास होय...

नारायण : ( दीर्घ हास्य) ख्या ख्या ख्या...

  

No comments:

Post a Comment